एकदा जायचं होतं अजोळला, लहानपणचे दिवस आठवले. डोळ्यासमोर ते चित्र येऊन, माझे डोळे पाणावले. आजी - आजोबाचं प्रेम मी खूप अनुभवलेले, आता गावी जाऊन आंबे खायचे होते. त्या चिमुकल्या डोक्यावरून ते सुरकुतलेले हात फिरले, अल्लड मन असून अंग माझे शहारले. काहीच समज नसताना त्यांच्या डोळ्यातले प्रेम मला जाणवले, आणि आंबे खायचे सोडून मी त्यांचेच पापे घेतले. जगण्यासाठीचे त्यांचे श्रम कळतच नव्हते, पण जे काही मागितलं ते लगेचच मिळायचे ! ते दिवस आठवून मन माझे आनंदी झाले, पण आज तेच गाव वाटते वाळवंटलेले... प्रवासात असताना मी त्याच विचारात गुंतलेलो, पण अचानक मला अजोळला जायचे कारण आठवले. कारण होतं असं, की मला एक फोन आलं, आणि तिकडून ते म्हणाले की आजोबा गेले..... - आशित साबळे.