(आत्तापर्यंतच्या एकूण वाचनातून आणि अनुभवांमधून मला काय जाणवलं ते या कवितेत आहे.) तुमच्यासारखं आमच्या कवितेत नसतात यमक, पण असतात गमक समाजाचे. तुमच्या संस्कृतला आम्ही हुंगत पण नाही, आमच्या साहित्याला निर्माण करायला. ते वाटू द्या तुम्हाला प्राकृत, आम्ही आहोतच अस्पृश्य मेनस्ट्रीमपासून दलित म्हणून. निसर्गाने दिलेल्या जगण्याला, आणि जगण्यातल्या स्वातंत्र्याला आम्ही जागवतोय, आंबेडकरी म्हणून. आमचं जगणंच असतं आमचं साहित्य, आमच्या वेदनाच असतात आमचे शब्द. तुमचे गोड गुलाबी रोमँटिक काव्य माणूसपणाच्या काही कामाचे नाही. त्यातून वासच येत असतो वासनेचा, प्रेमाच्या पलीकडे न जाणाऱ्या सडक्या मेंदूचा. आमच्या जहाल विद्रोही साहित्यातून व्यक्त होत असते चीड अन्यायाची, सोबत असते बुद्धाची करुणा माणसाला मुक्त करण्यासाठी. - आशित रजनी.